स्मृतीबनातून-आर्जव(पद्य)
काल राजा मेहदी अली यांचं मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि इंटरनेट वर 30 कोटी हुन अधिक श्रोत्यांचं प्रेम लाभलेल्या लग जा गले के फिर यही या साहिर यांच्या गीताचे #अजय साहेब यांनी लिहिलेले आणि #राजेश सिंग यांनी प्रस्तुत केलेले अप्रतिम नवे अंतरे ऐकत असताना माझ्या मनात उठलेले तरंग...आपल्यासाठी...
आर्जव
देण्यास तुजसी आता, नसे सुमनांची ओंजळ
सु'मनात'साठविले तुला, भाव आहे प्रांजळ
स्वीकार मोठ्या मनाने, करितो अंतिम आर्जव
कुणास शक्य असतो; रोखून घेणे वेग काळ
थबकून आज पळभरी, बोलून प्रेम बोल
ठाऊक कुणाला, परतूनी होईल का ही भेट
आयुष्य विझू लागले, चल चेतवू क्षणकाल
पदही थरथरू लागले, ओलांडू रानमाळ
कोण जाणे या पुढती, हाती असेल का हा हात
भाग्ये लाभली आपणास, ही कांचन सायंकाळ
निर्विकल्प साधला, दिसता अंबरी बकमाळ
भाळी नसेल पुढती, बघ ऐसा सुवर्ण काळ
गळा भेट घेई, संधी परत मिळणार नाही
मिठी घालुनी परस्परांना, डोळ्यातून नीर वाही
पुन्हा भूतलावर, या नजरा भिडणार नाही
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
090220252315
रविवार, ठाणे

👌👍
उत्तर द्याहटवा