स्मृतीबनातून –रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी
‘ रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी’ उन्हाळ्याचे दिवस. दिवसभर आग ओकणारा सूर्य आता थोडा मवाळ झाला होता. मावळतीचं त्याचं हे आरक्त रूपबिंब फारच विलोभनीय दिसत होतं. ते कॅमेरात कैद करण्याचा मोह आवरला नाही. आकाशी जणू झुंबर लावल्या प्रमाणे तो लोहगोल दिसत होता. दिवे लागण्याची ही वेळ. भास्कराच्या मावळण्यानी पसरत जाणाऱ्या अंधारात रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूर पर्यंत दिसत असलेल्या वस्त्यांमध्ये लागलेले दिवे, परिसर प्रकाशमान करत होते. दिठीनं हे सारं पाहत असताना अगदी सहजपणे एक आशयपूर्ण कविता ओठी आली. ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले....’ गोव्याचे प्रतिभावंत कवी शंकरबाब रामाणी यांची ही कविता. गोव्याचेच एक प्रतिभा संपन्न गायक, संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांनी या काव्याचं गाणं करून ते अनेक कानांपर्यंत पोहोचवलं. या गाण्याकडे निव्वळ गाणं म्हणून न पाहता नीट आकळून घेणं आनंददायी आणि योग्य ही ठरेल. ‘ दिवे लागले ’ या काव्याची जी काही माहिती हाती लागली त्यानुसार या कवितेला रामाणी यांच्या पत्नीच्या अखेरच्या असाध्य आजारपणाचा पदर आहे. त्यावेळी असलेल्या मानसिक स्थितीत मनात उत्पन्न ...