पोस्ट्स

स्मृतीबनातून – स्वरशब्दांत नखशिखांत रमलेला सुधीर कवी

इमेज
   स्वरशब्दांत नखशिखांत  रमलेला सुधीर कवी प्रतिभा! ती अशी सहजी कुणावर प्रसन्न होत नाही. अथक साधना किंवा प्रयत्नांनी ही, तिला वश करून घेता येईलच असं नाही. तिचा कृपाप्रसाद हा बहुदा पूर्व संचिताचा भाग असतो. पण तिचा एखादा कटाक्ष ज्याच्यावर पडतो, त्याची स्थिती ‘माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले’ अशी होऊन जाते. इतकेच नव्हे, तर 'माझे प्राण तुझे प्राण, उरले ना वेगळाले’ अशा अद्वैतावस्थेचा अनुभव येतो. एकदा का प्रतिभा आणि कलावंत यांच्यात हा तादात्म्य भाव रुजला, की मग पुढची वाटचाल विलक्षण होऊन जाते. ​ “मला लागे तुझी आस, तुला जडे माझा ध्यास तुला मला चोहीकडे, माझे तुझे होती भास॥ ​ माझ्यातून तू वाहसी, तुझ्यातही मी पाहसी तुझ्यामाझ्यातले सारे, गूज माझ्यातुझ्यापाशी॥ ​ तुझी माझी पटे खूण, तुझी माझी हीच धून तुझे प्राण माझे प्राण, माझे मन तुझे मन॥” या सुधीर शब्दांना, संधिकाळी आळविल्या जाणाऱ्या पुरिया धनश्रीचे, विरह भावना गडद करणाऱ्या सुधीर स्वरांच कोंदण लाभलं तर संधिप्रकाशाची शांतता, कोमल रिषभ आणि तीव्र मध्यम स्वरांचं आंदोलन, निसर्गालाही विरहाच्या रंगात रंगवून टाकेल. मग ही ...

स्मृतीबनातून – ‘राधा को साथ लाना ’

इमेज
‘राधा को साथ लाना  ’ खरं तर रोज कितीतरी गोष्टी आपल्या नजरे खालून जात असतात, कानावर पडत असतात. मात्र या सगळ्याच आपल्या स्मृतींमध्ये जागा मिळवतात असं नाही. आयुष्यभरात प्रत्येक जण कितीतरी साहित्य, गीतं, कविता, रचना वाचत असतो, ऐकत असतो. कालौघात त्यातलं कित्येक स्मृतीकोषातून बाहेर फेकल्या जातं. ऐकताना, वाचताना कदाचित हे जाणवतही नाही पण काही गोष्टी अगदी नकळत स्मृती पटलावर कायमच्या कोरल्या जातात. स्मृतीबनात त्या जागा मिळवतात.  चाळीस एक वर्षांपूर्वी रस्तामार्गे काश्मीर प्रवास करत असताना बहुतेक रोज सकाळ– संध्याकाळ बस मध्ये लागणारी अनुप जलोटा यांनी गायलेली एक सुरेल, सुंदर पारंपरिक रचना हळूच मनाच्या कोपऱ्यात कधी जाऊन दडली हे त्यावेळी कळलंच नाही. त्यानंतर पुढे कधीतरी अभिषेकीबुवांनी भैरवी रागात बांधलेलं अंतरे वेगळे असले तरी तोच मुखडा असे  सवाई गंधर्व महोत्सवात गायलेले  भजन ऐकलं आणि स्मृतीबनात सळसळ झाली. अनेक विचार उचंबळून आले. ही रचना म्हणजे एक वैष्णव भजन आहे. कर्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करता, काही ठिकाणी ती भक्त कवी चित्रविचित्र महाराज यांची असल्याचा उल्लेख सापडला तर काही ठिक...

स्मृतीबनातून – बासरी आणि राधा

इमेज
  बासरी आणि राधा शरद ऋतूतली ती एक विलोभनीय रात्र होती.  निळ्याशार नितळ पाण्यानी यमुना दुथडी भरून वाहत होती. आकाशातला केशरी पूर्णचंद्र सतत खाली डोकावून पाहत असल्यामुळे तो या कालिंदीच्या जळात सामावून गेला होता. रात्र जसजशी वाढत होती तसतसं दृष्टिपथात असलेल्या साऱ्या गोकुळानी विशेषतः यमुना पात्रानी  जणू  रुपेरी काठ असलेलं भरजरी तलम वस्त्र ओढून घेतलं आहे असं भासत होतं . काठावरच्या कदंब वृक्षाची पानं वाऱ्याची झुळूक आली की बागडू लागत. बहुदा ती कोजागर्ती,  कोजागर्ती विचारत असावी.  याच कदंबा खाली कोजागिरी पौर्णिमे निमित्त एक भव्य रासमंडळ रचलं होतं. गोकुळातील समस्त गोप–गोपिका आपली सर्व कामं बाजूला सारून कृष्णा सोबत या दिव्य रासक्रीडेत सहभागी होता येणार म्हणून आनंदून गेली होती. तो रुपेरी चांदण प्रकाश, हवेतील गारवा आणि यमुनेच्या प्रवाहाचं मंद संगीत या साऱ्यांमुळे वातावरणात आगळीच अनुभूती जाणवत होती.   डोक्यावर मोरपंखी मुकुट, गळ्यात वैजयंती माला, खांद्यावर शेला आणि पितांबर परिधान केलेला कृष्ण मध्यभागी उभा होता. कंबरपट्टयात खोचली होती त्याची प्राणप्रिय बासरी. चं...

स्मृतीबनातून –स्वरशब्द स्मृती(पद्य)

इमेज
स्वरशब्द स्मृती सुमन हे असे कोणते स्वरशब्द छान जाणते  वाऱ्यावरती घेत लकेरी  गातात जणू जल लहरी सहज असे कधी दुपारी आपणास ते गुपित सांगी  मृदुल करांनी हळूवार  छेडित जाते हृदय तार आस अंतरी आहे सांगते आसरा हृदयात मागते  सख्याचे एक गीत ऐकते स्वरांनी धुंद होऊन जाते शब्द शब्द ते ठेवी जपून बकुळीच्या सुगंधा समान केतकी बनी नाचे मयुर नभात मेघ गहिवरत दारी मग पडता पाऊस मातीचा सुगंध पसरत सागरास धरणी मिळते तिथे आपुली वाट पहाते नयन बोलता काहीतरी ते खुळे हासते खुळ्यापरी काहूर मनी येते दाटून दिनरात तयाला स्मरून झरती त्या झिमझिम धारा रात कधी ती उदास जाता विचारे आठवते का सारे?  मन दवात होता हळवे पहिलीच जशी भेट होते दो नयनांची जादू घडते उघडी एक चंदनी दार सजवते सोन्याचा संसार गेले जरी ते आता विरून क्षणोक्षणी होईल स्मरण नितीन सप्रे 040620261030

स्मृतीबनातून –सजण दारी उभा

इमेज
  सजण दारी उभा लवचिकता हा भाषेचा स्वभावधर्म आहे. जशी वळवावी तशी ती वळत जाते. एकाच शब्दाला अर्थाच्या कितीतरी छटा असू शकतात. ही भाषेची श्रीमंती मानली जाते. मराठी भाषेतही विभिन्न अर्थछटा असलेले कितीतरी शब्द आहेत. जसे जीवन, तीर, मान, पाठ, वर, नाव, काळ अशी मोठी यादी देता येईल. जी गोष्ट शब्दांना लागू तीच वाक्याला, लेखाला, कवितेला ही लागू होते. त्यामुळेच एकच साहित्यकृती निरनिराळ्या वाचकांना निरनिराळी भासू शकते. त्यांना निरनिराळा अर्थबोध होऊ शकतो. जो जशी व्याख्या करेल, अर्थ काढेल त्याप्रमाणे तो बदलतो. मराठी काव्याचा प्रांत तर या वैशिष्ट्यानं समृद्ध आहे. मराठीत अशी कितीतरी गाणी, कविता, रचना आहेत की त्यांचा वरवरचा अर्थ एक, तर सखोल अर्थ अगदीच निराळा असतो. काहीवेळा वरकरणी शृंगारिक, लौकिक वाटणाऱ्या एखाद्या कवितेच्या गर्भात गहन, गूढ, रहस्यमयी, अलौकिक अर्थ जोपासलेला असू शकतो किंवा जुळ्या भावंडांप्रमाणे दोन्ही अर्थ अगदी सुखनैव नांदू शकतात. अनेकदा तर पुनःपुन्हा ऐकताना दरवेळी अर्थाचा नवा पदर उलगडून येतो.  सकृतदर्शनी प्रियकर–प्रेयसी, विरह भावना, मीलनाची ओढ अशा शृंगार प्रांतात घेऊन जाणारी सुरेश भ...

स्मृतीबनातून –रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी

इमेज
‘ रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी’ उन्हाळ्याचे दिवस. दिवसभर आग ओकणारा सूर्य आता थोडा मवाळ झाला होता. मावळतीचं त्याचं हे आरक्त रूपबिंब फारच विलोभनीय दिसत होतं. ते कॅमेरात कैद करण्याचा मोह आवरला नाही. आकाशी जणू झुंबर लावल्या प्रमाणे तो लोहगोल दिसत होता. दिवे लागणीची ही वेळ. भास्कराच्या मावळण्यानी पसरत जाणाऱ्या अंधारात रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूर पर्यंत दिसत असलेल्या वस्त्यांमध्ये लागलेले दिवे, परिसर प्रकाशमान करत होते.  दिठीनं हे सारं पाहत असताना अगदी सहजपणे एक आशयपूर्ण कविता ओठी आली.  ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले....’ गोव्याचे प्रतिभावंत कवी शंकरबाब रामाणी यांची ही कविता. गोव्याचेच एक प्रतिभा संपन्न गायक, संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांनी या काव्याचं गाणं करून ते अनेक कानांपर्यंत पोहोचवलं. या गाण्याकडे निव्वळ गाणं म्हणून न पाहता नीट आकळून घेणं आनंददायी आणि योग्य ही ठरेल. ‘ दिवे लागले ’ या काव्याची जी काही माहिती हाती लागली त्यानुसार या कवितेला रामाणी यांच्या पत्नीच्या अखेरच्या असाध्य आजारपणाचा पदर आहे. त्यावेळी असलेल्या मानसिक स्थितीत मनात उत्पन्न झालेल्या...

स्मृतीबनातून – एकांत(पद्य)

इमेज
  एकांत आज फिरून आठवांचे, दाटून अभ्र आले  सरोवर डोळ्यांचे, अश्रूंनी तुडुंब भरले या कातर संध्याकाळी, सोबतीस नाही कोणी  शेवही तिचा नव्हता, थोपविण्यास ते पाणी एकांत निशेचा सारा, तो असह्य जीवघेणा आस उषेची होती, परी सरता रात सरेना रोखला हुंदका कंठी, ओठी ठेवले स्मितास उमजून जगरीती ही, मी जपले एकांतास  नितीन सप्रे 220520261600