स्मृतीबनातून – ‘राधा को साथ लाना ’
‘राधा को साथ लाना ’ खरं तर रोज कितीतरी गोष्टी आपल्या नजरे खालून जात असतात, कानावर पडत असतात. मात्र या सगळ्याच आपल्या स्मृतींमध्ये जागा मिळवतात असं नाही. आयुष्यभरात प्रत्येक जण किती साहित्य, गीतं, कविता, रचना वाचत असतो, ऐकत असतो. कालौघात त्यातलं कित्येक स्मृतीकोषातून बाहेर फेकल्या जातं. ऐकताना, वाचताना कदाचित हे जाणवतही नाही पण काही गोष्टी अगदी नकळत स्मृती पटलावर कायमच्या कोरल्या जातात. स्मृतीबनात त्या जागा मिळवतात. चाळीस एक वर्षांपूर्वी रस्तामार्गे काश्मीर प्रवास करत असताना बहुतेक रोज सकाळ– संध्याकाळ बस मध्ये लागणारी अनुप जलोटा यांनी गायलेली एक सुरेल, सुंदर पारंपरिक रचना हळूच मनाच्या कोपऱ्यात कधी जाऊन बसली हे त्यावेळी कळलंच नाही. त्यानंतर पुढे कधीतरी अभिषेकीबुवांनी भैरवी रागात बांधलेलं अंतरे वेगळे असले तरी तोच मुखडा असे सवाई गंधर्व महोत्सवात गायलेले भजन ऐकलं आणि स्मृतीबनात सळसळ झाली. अनेक विचार उचंबळून आले. ही रचना म्हणजे एक वैष्णव भजन आहे. कर्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करता काही ठिकाणी ती भक्त कवी चित्रविचित्र महाराज यांची असल्याचा उल्लेख सापडला तर काही ठिकाणी ...