कविराज : दर्शनिक गीतकार
कविराज : दर्शनिक गीतकार प्रीती आणि क्रांती ‘ओ सजना बरखा बहार आइ रस की फुआर लायी’ या सारख्या सरल, तरल, उत्कट सदाफुली शब्दांतून हळुवार प्रीत भावना फुलवणारा कवी आणि ‘ हर जोर जुलूम की टक्कर में हडताल हमारा नारा है’ असा क्रांतीचा जळजळीत एल्गार करणारा कॉमरेड, या कुणी दोन भिन्न व्यक्ती नसून एकच आहे असं सांगितलं; तर सकृतदर्शनी कुणाचाही विश्वास बसणं कठीण आहे. पण हे निखळ सत्य आहे. या परस्पर विरोधी भावनांची अभिव्यक्ती शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र या एकाच व्यक्तीच्या लेखणीतून साकारली आहे. ऐन तारुण्यात ध्येयवादाच्या अश्वावर आरूढ, वर्गसंघर्षावर मनात धगधगत असलेली आग शब्दरूपातून व्यक्त करणाऱ्या या प्रतिभावान कवीनं सामान्य माणसाच्या सुखदुःखाची, प्रीतीची, जीवन विषयक गहन तत्त्वज्ञान सांगणारी अनेक गीतं अगदी सरल शब्दात रचून आपल्या अमोघ काव्य प्रतिभेचा जणू पुरावाच सादर केला. साध्या शब्दांतून अर्थाशयाची सखोल दार्शनिकता उलगडून दाखवणं ही मुळी त्याची विशेषता. पण शब्दांच्या फुलोऱ्यानी चरितार्थ सजवता येत नसतो. म्हणून संसाराची गाडी रुळावर ठेवण्यासाठी या संवेदनशील, अवलिया कवीनं...