स्मृतीबनातून: कंठमती सूर मालिनी

‘कंठी कौस्तुभ मणी विराजित’ कंठमती सूर मालिनी : कलाकार नव्हे कलोपासक आजच्या सारखं ग्लॅमरस शाळांचं पेव फुटलं नसतानाच्या काळात, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ ही म्हण मराठी शाळेत जाणारी मुलं साधारणतः प्राथमिक शाळेत असतानाच पाठ करायची आणि पुढे समाजात वावरत असताना त्या म्हणीचा अर्थ नीट समजायला लागायचा. नागपूर, मुंबई, पुणे अशा शहरांत बव्हंशी काळ घालवलेल्या माझ्या आयुष्यात, नुकत्याच संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात क्वचित घडावा असा योगायोग प्रथमच घडून आला. या डिसेंबर महिन्यात(2024) वाराणसी, आग्रा, गोकुळ, वृंदावन आणि खरगोन (मध्यप्रदेश) प्रवासाच्या निमित्तानं, गंगा, यमुना आणि नर्मदा या तीनही पुण्यपावन नद्यांच्या दर्शनाचा लाभ झाला. या तीनही नद्यांच्या शांत, विस्तीर्ण पात्रांकडे बघताना मनातील उथळ खळखळाट निवून जाऊन एकप्रकारचा शांतभाव आपोआप उगम पावतो. सेवा निवृत्तीच्या महिन्यात जुळून आलेला हा योग विशेष होता. या पार्श्वभुमीवर नवीन वर्षाची आणि आयुष्याच्या नव्या आवृत्तीची सुरुवात झाली ती भाग्यनगर संस्कृती संमेलनाच्या निमित्तानं हैद्राबाद प्रवासानी. आता हैद्राबाद हे नाव घेताच चटकन आठवतात ते सलारगं...