स्मृतीबनातून - सुगंध मातीचा
सुगंध मातीचा
दारी पडणाऱ्या पावसाचे थेंब अंगणात नाचू लागले, मातीचा सुगंध दरवळला, दग्ध झलेलेले सर्व भाव पुन्हा फुलून आले, धुक्यातून कुणाचं भावगीत सुरू झालं, सांजवेळी पैल राहिलेलं गावं आठवलं किंवा पंढरपूर गर्जू लागलं, जीवाला चकोरा सम कैवल्याच्या चांदण्याची ओढ लागली आणि नाचणाऱ्या वैष्णवांच्या डोळी नीर वाहू लागलं की जे जे काही आठवू लागतं त्यात अशोक गणेश परांजपे यांची आठवण ही अपरिहार्य आहे. प्रसिद्धीला सिद्धी न मानणारे अशोकजी साठच्या दशकापर्यंत जन्मलेल्या मराठी रसिकाला अपरिचित नाही. या कवीच्या नावात वडिलांच्या नावातलं इंग्रजी 'G' (जी) हे अद्याक्षर या कवीच्या नावाला अंत्याक्षर रुपात जोडलं गेलं आणि ते अशोकजी परांजपे असं रूढ झालं.
सुमन कल्याणपूर, अशोक पत्की, जितेंद्र अभिषेकी, प्रभा अत्रे, कमलाकर भागवत या सारख्या गुणीजनांच्या संगतीनं, मनाला भुरळ पाडणाऱ्या, सरल हळुवार भावगीतं असोत किंवा भक्तीरसात चिंब भिजलेल्या अशोकजींच्या कवितांनी, गीतांनी नादावला न गेलेला खरा चोखंदळ मराठी रसिक सापडणं अशक्य आहे.
सांगली जिल्ह्यातलं हरिपूर हे नाटककार गोविंद बल्लाळ देवल (संगीत शारदा, मृच्छकटिक, संशय कल्लोळ) यांचं गाव ही अशोकजींची जन्मभूमी. देवलांचा जन्म जरी कोकणातला असला तरी त्यांचं बालपण हरिपूर मध्ये गेलं होतं. अशोकजींना याचा विशेष अभिमान होता. मुंबई ही त्यांची कर्मभूमी आणि औरंगाबाद हा विश्रांतीसाठीचा वानप्रस्थाश्रम. पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मुंबई मार्गे मराठवाड्याला मिळण्याची ही घटना दुर्मिळच म्हणावी लागेल. कदाचित प्रादेशिक समतोल साधण्याचा हा त्यांचा मार्ग असावा.
सांगलीतलं वातावरण प्रथम पासून कलापोषक राहिलं आहे. अशोकजींना लहानपणा पासूनच गीत, संगीत, नाटक, लोकनाट्य, लोककला, चित्रकला अश्या विविध कला प्रांतात विशेष रस होता. मुंबईत आल्यावर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये चित्रकारीतेच शिक्षण घेतलं. व्यक्तिमत्व जरी थोडं रांगड असलं तरी ते कवी मनाचे होते. त्यांची हीच कोमलता त्यांच्या काव्यातही प्रतिबिंबित झालेली दिसते. हरिपूरला कृष्णेचं पात्र,नीरव शांतता, दोन तटां दरम्यान ये जा करणारी नाव हे अनुभवत असताना 'नाविका रे वारा वाहे रे डौलाने हाक जरा आज नाव रे' या सारखं, म्हटलं तर सुंदर कोळीगीत किंवा सांजवेळ (आयुष्याची) झाली आता पैल माझं गाव रे (हे जग ओलांडून नीजधामी जायचं आहे) तेव्हा नाव डौलाने हाक (हा प्रवास डौलदार कर) असा गर्भितार्थ सुचावणारं तरल भावपूर्ण गीत त्यांना सुचतं. केतकीच्या वनातल्या मयूर नृत्यानं गहिवरून, मेघाचा धीर सुटतो अशी कवीकल्पना त्यांच्या लेखणीतून उगवते आणि बागेश्री च्या अंगानं फुलतं 'केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर'
क्लिक -केतकीच्या बनी तिथे
'दारी पाऊस पडतो रानी पारवा भिजतो', 'एकदाच यावे सखया', 'कुणी निंदावे कुणी वंदावे', 'दारी उभी अशी मी गेली निघून रात', 'पैलतिरी रानामाजी', 'पाखरां जा दूर देशी', 'वाट इथे स्वप्नातील संपली जणू', 'सहज तुला गुपित एक सांगते', 'साक्षिस चंद्र आणि हळुवार स्पर्श होते' अशी भावरसात सचैल न्हायलेली किती तरी भावगीतं आपलं मन गाऊ लागतं. भक्ती मार्गावर विचरण केलं तर गोरा कुंभार नाटकातलं, अंगावर भक्ती रोमांच फुलावणाऱ्या 'अवघे गर्जे पंढरपूर' या त्यांच्या गीतावर, हाती चिपळ्या घेऊन ताल धरावासा वाटू लागतो.
क्लिक -अवघे गर्जे पंढरपूर
भैरवीचे सूर ल्यायलेलं 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' कोणी, कधी तरी विसरू शकेल का? संत गोरा कुंभार नाटकाचं लिखाण सुरू असताना पंडित जितेंद्र अभिषेकी बुआंनी, नाटकाचा समारोप असा व्हावा की रसिक तेच शब्द, सूर घेऊन घरी जावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. असं सांगतात की बहुदा लोणावळ्यात बुआंच गाणं सुरू असतानाच आकाशातला चंद्र पाहून अशोकजींना चंद्र व्हावो पांडुरंगा सुचलं.
क्लिक -कैवल्याच्या चांदण्याला
दार उघडं बया नाटकातलं ललत मध्ये बांधलेलं 'विनायका हो सिद्ध गणेशा' हे ही असंच एक अविस्मरणीय पद. 'पाहू द्या रे रूप मज विठोबाचे', 'ब्रह्म मूर्तिमंत' ही नाट्य भक्तिगीतं, महानंदा नाटकातलं 'तुझिया गे चरणीचा', आतून कीर्तन वरून तमाशा या नाटकातली 'रात्र श्रावणी आज राजसा' ही अभिजात लावणी त्यांच्या चतुरस्र प्रतिभेची ओळख पटवून देते. त्यांच्या हस्ताक्षरातील
ही अप्रकाशित कविता.लहानपणी आकाशवाणीमुळेच परिचित झालेल्या अनेक गीतां मध्ये अशोकजींच्या नानाविध रचना नकळत काळजात घर करून होत्या. नित्य नेमाने क अर्चना भक्ती संगीताच्या कार्यक्रमातून ऐकलेल्या अशोकजींच्या भक्तीगीतांनीही मनात कायमची जागा मिळवली. गळा आणि कदाचित भक्तीही तितकीशी अस्सल नसल्यामुळे गायन अथवा संगीत शास्त्रात अव्वलता गाठण्याच्या शक्यतेला स्वतः कडूनच नख लावल्या गेलं तरी नियतीनं दयाळूपणे श्रवण, मनन, आकलन यांचं जे थोडं फार दान पदरी टाकलं त्याचं मूल्य आता कळतं आहे. त्यावेळी खरं तर या गीतांचे कर्ते कोण हे देखील माहीत नसे. गाणं कसं ऐकावं, शब्दकळा, स्वरकला यांचा रसास्वाद कसा घ्यावा याचं थोडं फार भान पुढे आकाशवाणीच्या सेवेत आल्यावर येत गेलं. यासाठी प्रसार माध्यमातील, विशेषत: आकाशवाणीत सेवा करण्याच्या मिळालेल्या संधी बद्दल मी परमेश्वराचा अत्यंतिक ऋणी आहे. आकाशवाणीच्या नोकरीत मिळणाऱ्या वेतना मुळे, जगण्याच्या मूलभूत गरजा भागवण्याच्या सोयी बरोबरच, अभिजात जगण्याची चेतना ही जागृत झाली. लक्ष्मी अन्य कुठल्याही चाकरीतून प्रसन्न झाली असती मात्र तिच्या बरोबर सरस्वतीही कृपावंत झालीच असती असं नाही. आकाशवाणी कडून आयुष्यभरासाठी मिळालेल्या ह्या मिळकतीचं मोल कसं ठरवणार? वेतनाच्या जोडीनं मिळालेला हा चेतनाचा ठेवा अनमोल आहे. ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रसंगात जणू काही आपणही उपस्थित होतो अशी अनुभूती देणाऱ्या अशोकजींच्या अत्युत्तम गीताशी सविस्तर ओळख झाली ती ही आकाशवाणीतच. अर्थात 'समाधी घेऊन जाई ज्ञानदेव' ह्या संजीवन समाधी सोहळ्याचा, भावसमाधी सदृश अनुभव देण्यात अशोकजींच्या शब्दकळेला तोलामोलाची साथ मिळाली ती भागवती संगीत(संगीतकार कमलाकर भागवत) आणि निर्मळ सुमन स्वरांची (गायिका सुमन कल्याणपूर) यांची.
'नीर वाहे डोळा वैष्णव नाचतो
वैकुंठासी जातो ज्ञानराया
सोन्याचा पिंपळ झालासे निश्चल
सज्जनांचे बळ समाधान।'
माऊली समाधिस्थ झाल्या त्या क्षणाला काय वातावरण असेल याची प्रचिती हे भावकाव्य ऐकताना प्रत्येक वेळी मिळते. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर माउलींना समाधी दिली. गुरुनं सदेह, शिष्याला समाधी देण्याचं हे एक मात्र उदाहरण असेल. हे दुर्मिळ निरीक्षण अशोकजींनी बरोब्बर मांडलं आहे.
'गुरू देई शिष्या समाधी आपण
देवा ऐसे मन का बा केले?'
'पैलतीरी हाक आली आज कानी
करूनि निर्वाणी बोलविले
ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला
कैवल्यचि झाला भक्तजन…'
त्या सर्वेश्र्वराचा कौल मिळाला तरच या प्रतीचं सृजन शक्य आहे.
क्लिक : समाधी घेऊन जाई ज्ञानदेव
नाटककार म्हणूनही अशोकजी परांजपे यांनी मराठी रंगभूमी साठी दिलेलं योगदान उल्लेखनीय म्हटलं पाहिजे. संत गोरा कुंभार, संत कान्होपात्रा, बुद्ध इथे हरला आहे, अबक दुबक, आतून कीर्तन वरून तमाशा, दार उघड बया सारख्या नाटक, लोकनाट्यांनी रंगभूमीच्या वैभवात मोलाची भर घातली. अशोकजींना अभिजात वाङ्मया प्रमाणेच लोकवाङ्मयही प्रिय होतं. शंकराचार्याचे श्लोक आणि पठ्ठेबापूरावांच्या लावण्या त्यांच्या ओठी एकाच वेळी भक्तिभावनेनं नांदत असत. लोककलां बद्दलची त्यांची प्रीती आणि व्यासंग हे दोन्ही वाखाणण्याजोगं होतं. इंडियन नॅशनल थिएटर लोक प्रयोज्य कला संशोधन केंद्राचे ते संचालक होते. या केंद्रातर्फे 1986 साली आनंदवन वरोरा येथे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात आदिवासी महोत्सव आयोजित केला होता. 1992 साली पंढरपूर इथे भक्तीसंगीत महोत्सवही त्यांनी आयोजित केला होता. लोककला आणि लोककलावंतांना नागर रंगमंचावर उतरविण्याचं मोठं काम त्यांनी केलं. आय.एन.टी संशोधन केंद्राच्या खंडोबाचं लगीन, दशावतारी राजा, जांभूळख्यान, वासुदेव सांगती, अरे रे संसार, मातीचं स्वप्न या संशोधन नाट्यांची मूळ संकल्पना आणि लेखन मार्गदर्शन अशोकजी परांजपे यांचीच होती. विठ्ठलाचा ठाव ठिकाणा सांगताना ते म्हणतात…'शेतातल्या चिखलामध्ये उभा रे श्रीरंग' पुढे ते आणखी स्पष्ट करतात… 'देव नाही राउळात नाही त्या आकार देव आहे तुमचा आमचा मानवी आचार' अश्या प्रकारे त्यांच्या संवेदनशीलतेला सामाजिकतेचा आणि कर्मप्रवणतेचा पदर होता. ते गोष्टी वेल्हाळ होते. त्यांच निसर्गप्रेम केवळ गीतांतूनच नाही तर चित्रांतूनही व्यक्त झालं आहे. महाराष्ट्राच्या ग्राम्य जीवनाशी जुळलेली नाळ अभिमानाने मिळवणारा, मराठी लोक जीवन, लोक कलांचा अभ्यासक, संशोधक, असा खऱ्या अर्थानं मराठी ओल्या मातीचा सुगंध पसरविणाऱ्या या साहित्यिकाची जीवन सांगता आत्महत्येनं व्हावी ही बाब मात्र मनाला चटकन पटत नव्हती. या संदर्भात माझे एक परिचित आणि अशोकजींचे निकटवर्तीय, महाराष्ट्रातल्या लोककला प्रवाहांचे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे माजी विभाग प्रमुख प्रकाश खांडगे यांच्याशी बोलताना काही खुलासा होत गेला. त्यांच कथन पटण्या सारखं ही वाटलं. त्यांनी सांगितलं की, अशोकजी हे काहीसे अवलिया प्रवृत्तीचे होते. आयुष्याच्या संध्याकाळी औरंगाबादला स्थाईक झाल्यावर त्यांनी वयाच्या साठीत जीवनसाथी निवडला होता. पांढरपेशी दांभिक आचार विचारांशी त्यांच कधीच सख्य जुळलं नाही. यशाच्या शिखरावर असतानाही त्यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोता पासून दूर राखलं होतं. ऐहिक जीवनाचा मोह त्यांना कधीच नव्हता. संपूर्ण आयुष्य ते निर्वाण मार्गाचे पांथस्थ या आविर्भावातच जगले. 9 एप्रिल 2009 रोजी औरंगाबादच्या घटने आधी, गिरगावात नॅशनल हॉस्टेल इथे रहात असतानाही त्यांनी एकदा आत्महत्येचा असफल प्रयत्न केला होता. जगाच्या दृष्टीनं जरी ही आत्महत्या असली, तरी ही उर्मी एक प्रकारे इच्छामरण, निर्वाणाच्या ओढीतून उत्पन्न झाली असावी.
लौकिक जीवन जगत असताना निदान एका तरी अलौकिक कृती साठी नटराज नटेश्र्वरानी आपली निवड करणं, हीच कुठल्याही अभिजात कलाकारासाठी कला जीवनाची कैवल्य परिसीमा असावी. हे साधलं तर मग देहयात्रेत किती काळ गुंतून पडावं? आत्मा जसा मुक्त आहे तशीच देहपाशातून ही मुक्तता करून घ्यावी अशी मनाची अवस्था होणं स्वाभाविकच नाही का? अशोकजी परांजपे यांनाही त्या कैवल्य चांदण्याची चकोरा प्रमाणे आस लागली असावी, वृद्धत्वात पैल तीर दिसु लागला असताना ऐहिकाचा बडिवार व्यर्थ वाटून चराचरा पार होण्यास आता अधिक उशीर होऊ नये म्हणून, त्या बा पांडुरंगाला मन थोर करण्याची विनंती करत निर्वाण तर साधलं नाही?
"चराचरा पार न्या हो
जाहला उशीर
'पांडुरंग' 'पांडुरंग'
मन करा थोर"
ll हरी ओम तत्सत ll
नितीन सप्रे
8851540881
नवी दिल्ली.





अशोकजी परांजपे हे मराठी साहित्यातील खूप आदराने घेतले जाणारे नाव खरंच ते एक मोठे कवी होते .माणूस म्हणून जगताना अवलिया सारखच ते जीवन जगले. त्यांची गाणी त्यांच्या कविता त्यांनी लिहिलेले भक्ती गीत हे आपल्याला मिळालेली शब्दरत्न खाणच आहे .शेवटच्या दिवसांमध्ये ते औरंगाबादला आले होते ,राहिले होते माझ्या सुदैवान त्यांच्या भेटीच्या काही घटना आठवतात त्या नितीन सप्रे यांच्या या लेखामुळे ताज्या झाल्या ।खरच खूप ग्रेट होते ते त्यांना त्यांच्या स्मृतींना सलाम
उत्तर द्याहटवानितीन जी लेख खूप छान झालाय.
धन्यवाद