स्मृतीबनातून - 'कर्मयोग'
‘सुगमगीत सांगे गीतसार’
कित्येकदा आपल्यापैकी अनेक जण एखादा विषय गहन आहे, क्लिष्ट आहे, समजुतीच्या बाहेर आहे असे काही समज (stereos) आपल्या मनात बाळगून असतात. मनाच्या असल्या धारणेमुळे, एखादा प्रांत हा आपला नाही असा निष्कर्षही काढतात. पण दुर्बोधता ही मुळी नेहमी विषयातच असते असं नाही तर बरेचदा ती समजावून सांगणाऱ्यांच्या मांडणीत असते असं मला कित्येकदा वाटतं. काही जणांना दुर्बोध, कठीण असा विषयही सुबोध, सरल आणि सुगम रीतीनं मांडण्याचं कसब साध्य झालेलं असतं.
भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ, भगवद्गीतेचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखादा व्यासंगी ज्ञानार्जनासाठी मूळ ग्रंथ वाचेल, त्यावरील टीका वाचेल पण सरसकट सामान्य माणसाला "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन","नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः","वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि" या श्लोकांची तोंडओळख भलेही असेल पण अठरा अध्याय, सातशे श्लोक असा समग्र व्यासंग करणारी मंडळी संख्येनं निश्चितच मर्यादित असणार. अशा लोकांपर्यंत गीतेचं तत्वज्ञान पोहोचवायचं असेल तर फार विद्वत्तापूर्ण, जटील विवेचन निश्चितच कामी येणार नाही. मग असे लोक यापासून विन्मुखच राहणार का? असा प्रश्न मनात येतो आणि तेव्हा गीतकार, संगीतकार पंडित मनोहर कवीश्वर यांनी आपलं नाव आणि आडनाव सार्थ करीत गीतेच्या केलेल्या सुलभ, सुगम मांडणीतून या प्रश्नाचे उत्तर समोर येतं. त्यांनी अवघ्या पांच कडव्यांच्या आपल्या गीताला स्वतःच संगीतबद्ध करून या संपूर्ण गीतेचं सार अत्यंतिक सुगम सुलभ पद्धतीनं सामान्यजनां समोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
गीत रचना
‘विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था
शस्त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला
कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला
घे शास्त्राते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था II१II
कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा
मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा
इह परलोकी अशांतीने तव विक्रम
झुकवील माथा II२II
कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा
क्षणभंगूर ही संसृती आहे खेळ ईश्वराचा
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था II३II
रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो
मीच घडवीतो मीच मोडीतो उमज आता
परमार्था II४II
कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा
सर्व धर्म परी त्यजून येई शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था’ II५II
खरंतर सर्वांगानं अलौकिक अशी रचना! कवितेतल्या शब्दांची निवड अत्यंत चपखल. गीताची चाल आणि गायन असं की कुरूक्षत्रावर कर्तव्यच्युत होऊ पहाणाऱ्या अर्जुनाला, भगवान श्रीकृष्णांनी केलेल्या उपदेशाचा प्रसंग ऐकणाऱ्याच्या डोळ्यांपुढे साकारून येऊ शकेल अशा ताकदीचं. सुधीर फडके यांनीच हे गीत गावं अशी कवीश्वर यांची इच्छा होती. गीता तत्वज्ञानाच सार मनोहर शब्द आणि सुधीर सूर लाभल्यानी, सुगमगीत होऊन घराघरातल्या सामान्य जनांच्या आवाक्यात आलं आणि रुजलं ही समाधानाची बाब. मात्र या गीताचा कर्ता, बहुमुखी प्रतिभेचा हा वैदर्भीय गीतकार, संगीतकार आणि गायक आपल्या हयातीत आणि अद्यापही अवघ्या महाराष्ट्राला म्हणावा तसा परिचित झाला नाही हे मात्र दुर्दैवी.
गीत–संगीतकार कवीश्वर
गदिमां यांनी (गजानन दिगंबर माडगूळकर) लिहिलेल्या गीतरामायणा पासून प्रेरणा घेऊन कवीश्वर यांनी 'गीतगोविंद' या गीतसंग्रहाची रचना केली त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम ते स्वत: करत असत आणि गायन वादन अशा दुहेरी भूमिका ते बजावत. याच धर्तीवर त्यांनी 'गीतगजानन' (गजानन महाराजांचे चरित्र), 'गीतगौतम' आणि 'गीतचक्रधर' (चक्रधरस्वामींचे चरित्र) अशी अन्य चरित्रं गीतबद्ध आणि संगीतबद्ध केली.२००७ साली त्यांना देवाज्ञा झाली. अलौकिक रचनेला आणि रचनाकाराच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा प्रपंच!
विमोह त्यागून कर्म फलांचा - सुधीर फडके
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com

Apratim lekh ahe ..
उत्तर द्याहटवाVery informative
उत्तर द्याहटवाछान माहिती आहे
उत्तर द्याहटवाखूप नवीन माहिती!!-भारती निरगुडकर
उत्तर द्याहटवाआदरणीय कवीश्वर सरांकडे मी एक वर्ष गीत गायनाचे धडे घेऊ शकलो, सर. आपला लेख सर्वांगसुंदर झालाय. त्यांचं गाव बेलोरा जि. अमरावती, ता. चांदूरबाजार ते अमरावतीला स्थायिक झाले होते. सर आम्हाला 'गीत गोविंद, 'गीतगौतम' मधील काही पदही शिकवीत असत.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाआदरणीय कवीश्वर यांचं हे गीत कोणालाही आवडेल असेच आहे बाबूजींनी ते इतके सुंदर गायले आहे की गीतेच सार लगेच कळावं.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
आदरणीय मनोहर कविश्वरांवर आपण लिहिलेला हा लेख खुप छान ! मनोहर पंत गीत गोविंंद कार्यक्रम खुप सुंदर रितीने सादर करीत असत . मी
उत्तर द्याहटवाजवळ जवळ ३५ वर्षे अमरावतीत राहिलेलो असल्याने त्यांच्या कार्यक्रमाबद्दल नेहमी कानावर पडायचं . त्यांंनी रचलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी विशेष करुन हे गीत आणि " माना मानव वा परमेश्वर, माझ्या वडिलांची आवडती गाणी होती . आमच्या घरी जेव्हा भजन किंवा गाण्यांचा कार्यक्रम होत असे त्या मध्ये बरेेचदा ही गाणी असायची.
आपण लिहिलंय ते खरंच. स्वत: सुधीर फडके यांनी हे गीत गायलेलं असल्यामुळे याला विदर्भाबाहेर थोडी तरी प्रसिद्धी मिळाली .
आपल्या या लेखामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला .
खुप धन्यवाद या पोस्ट बद्दल. 🙏🙏
बाळबोध मांडणी !
उत्तर द्याहटवाब्लॉगच्या माध्यमातून सुंदरतेने मांडणी करून जे लिहिलं गेलं आहे त्यास तोड नाही, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
उत्तर द्याहटवास्व. श्री. बाबूजींचा ज्या गीताला हातभार लागतो ते गीत अजरामर होतं असं म्हटलं तर ती देखील अतिशयोक्ती नाहीच.
माझ्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी हेही एक सुंदर गीत... नितीनजी, खरंच सुंदर ब्लॉग.
संदीप कळके, ठाणे
फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवाभगवद् गीतेचे सार आहे हे ते ही अगदी मोजक्या शब्दात. नमन.
उत्तर द्याहटवा